Ticker

6/recent/ticker-posts

मित्रांच्या आठवणीत अजूनही “शाबजी, क्या भाया?” सोहेलचा जगाला निरोप..

 केनवड : नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात पिंपरी सरहद्द येथील २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ मार्च रोजी मध्यरात्री पवनी परिसरात घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २८ बीबी ९८५१ क्रमांकाची बोलेरो पिकअप नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एपी ३९ टीझेड ०१४४ क्रमांकाच्या ट्रकला भरधाव वेगात जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात पिकअपमध्ये किन्नर साईडला बसलेले सोहेल खान राजदार खान (वय २३, रा. पिंपरी सरहद्द) यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालक फिरोज पठाण यांना किरकोळ दुखापत झाली . घटनेची नोंद देवलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

दरम्यान, सोहेल खान यांचा दफनविधी ४ मार्च रोजी उशिरा रात्री पिंपरी सरहद्द येथील कब्रस्तानमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. सोहेल हे कुटुंबातील मोठे अपत्य व घराचा कमावता सदस्य असल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सोहेल खान हे डोणगाव येथील अक्वा फिल्टरच्या पाण्याच्या गाडीवर काम करत होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व सर्वांना आपलेसे करणारा होता. त्यामुळे परिसरात त्यांची चांगली ओळख निर्माण झाली होती. मात्र ईदचा सण जवळ येत असल्याने तुटपुंज्या मजुरीतून त्याची ईदची खरेदीसाठी गरज पूर्ण करणे कठीण होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांनी मिस्त्री कामावर मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. येणाऱ्या सणासाठी स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी चांगले कपडे खरेदी करण्याची त्यांची इच्छा होती.

मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. घटनेच्या दिवशी सायंकाळी पिकअप वाहनाचा चालक फिरोज पठाण यांनी एक ट्रिप मारून येण्याचे सांगितल्याने सोहेल घरातून बाहेर पडले. मात्र काही तासांतच त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी गावात पोहोचली आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.

सोहेल खान हे मित्रपरिवारात अत्यंत लोकप्रिय होते. त्यांचा हसतमुख आणि मैत्री जपणारा स्वभाव सर्वांना भावायचा. त्यांच्या मित्रांच्या आठवणीत अजूनही “शाबजी, क्या भाया?” असे त्यांचे शब्द घुमत असल्याचे मित्र भावुक होऊन सांगत आहेत. अगदी कमी वयात एका तरुणाचे आयुष्य असे अचानक संपल्याने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




Post a Comment

0 Comments