बाजारपेठ पूर्णतः बंद : ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
भागवत चव्हाण
परभणी : सोमनाथ व्यंकटराव सुर्यवंशी यांचा रविवारी पहाटे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ दि.१६ डिसेंबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या आवाहनास प्रतिसाद देत परभणी शेरासह तालुक्यातील बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. या दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची एका माथेफिरूने तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना घडली. त्या घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चास हिंसक वळण लागले. त्यात जाळपोळ, वाहनांची तोडफोड तसेच काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. त्यानंतर पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन करत जवळपास ३०० केसेस दाखल करत ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले. या दरम्यान न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाल्याने दि. १५ डिसेंबर रविवारी रोजी सकाळी परभणीत पुन्हा तणावपूर्ण वातावरण होते. बाजारपेठेतील दुकानेही बंद ठेवण्यात आली. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. दि. १६ डिसेंबर सोमवार रोजी सकाळपासून शहर बंद दरम्यान सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आहे.
0 Comments